उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा


पुणे – तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान त्यांनी यावेळी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगत विरोधकांना टोला लगावला. तसेच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगत मोदींवर निशाणा साधला होता. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.

कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले, दीड वर्षानंतर बाहेर पडले.. आता त्यांनी इतरांना उपदेश देण्याचे काही कारण नाही. की माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवरून प्रवास आहे. तुमचा जमिनीवर प्रवास व तुमचे पाय जमिनीवर राहणे, याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि याबद्दल खूप खूप आनंद, की तुमचे पाय सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत, ते जमिनीवर आहेत तर आम्हाला आनंद आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व दरेकरांनी काही हवाई प्रवास केलेला नसल्याचे चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.


तसेच, पंतप्रधान हे असे एक पद आहे, की ज्यांच्याबाबतीत धोका पत्करणे अवघड असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था त्यांना सूचवते की, अधिकाधिक पाहणी करायची असेल, तर तुम्ही हवाई पाहणी करा आणि हीच परंपरा आहे. हेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी देखील करत होत्या. त्यामुळे टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले.

याचबरोबर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर या दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी दुसऱ्याच दिवशी आढावा घेतला. आता त्यांचा प्रवास पूर्ण होत आहे. जमिनीवरून दोघांनी प्रवास केला, हवेतून नाही. त्यांच्या प्रवासानंतर माझा जो प्रवासही तो कोणाला कळणार नाही याचे कारण, ते विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना आढावा घेण्याचे अधिकार आहेत. ते एकूण प्रशासन म्हणून मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने मानले जातात.

मी माझ्या प्रवासात कार्यकर्त्यांना भेटतो, बैठका घेतो. पक्ष म्हणून आपल्याला काय करता येईल, याबाबत माझा समन्वय सुरू आहे. आशिष शेलार व मनिषा चौधरी दोघांनी संपूर्ण ठाणे, पालघर जिल्ह्यातील सगळा कोळी समाजाचा सर्वे केला. त्यांचे सांत्वन केले, त्यांचा आढावा केला. त्यांच्या बोटी फुटल्या आहेत, त्याची आकडेवारी गोळा केली आणि आज बहुतेक हे दोघं मुंबईतील कोळीवाड्यात जाणार आहेत. भाजपचा प्रदेशाध्यक्ष असल्याने मी प्रशासनिक आढावा घेऊ शकत नाही. मी माझ्या कोथरूड मतदारसंघाचा घेऊ शकतो, कारण मी तेथील आमदार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून गुजरातला मदत जाहीर करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीका-टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोणताही दुजाभाव पंतप्रधान मोदी करत नाहीत, सगळ्या एकार्थाने वावड्या असतात, सगळ्या अनावश्यक चर्चा असतात. मुंबईत असताना मी तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र प्रवास ठरला, पण हवामान खात्याने त्यांना प्रामुख्याने हवाई प्रवास करताना अजुनही महाराष्ट्रातील सागरी पट्ट्यात ते सोयीचे नाही अशाप्रकारची सूचना केली. म्हणून ते गुजरातला गेले पण गुजरातमध्ये जाऊन, संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत घोषित केली.

मदत केवळ गुजरातसाठी घोषित केली नाही. गोवा, महाराष्ट्र सारख्या राज्यांना सूचना केल्या की तुम्ही ताबडतोब पंचनामे करा, सर्वे करा आणि तुम्ही प्रस्ताव सादर करा, मी मदत देईन. गुजरातसाठी नावाचे वेगळे पॅकेज त्यांनी घोषित केले नाही. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रूपये संपूर्ण देशभरासाठी त्यांनी घोषित केले. माहिती नाही, हवामान खाते किंवा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने त्यांना सल्ला दिली की आता परतण्याची वेळ आहे, पण ते येतील सुद्धा पण त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील सर्व राज्यांना झालेल्या नुकसानीचे निवेदन, प्रस्ताव लगेच सादर करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.