म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा : अजित पवार


पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या तुटवडा नसून म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे ही समाधानकारक बाब आहे. परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या तुटवडा नाही. पण रेमडेसिवीरचा जास्त वापर नको, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. मात्र म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे आम्ही ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी संबंधित कंपन्यांशी संपर्क केला आहे. परंतु ठरल्याप्रमाणे तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार असल्याचे कंपन्यांनी सांगितल्यामुळे कोणत्या राज्याला किती इंजेक्शन द्यायची हे केंद्र सरकारच ठरवणार आहे.

अजित पवार लसीच्या पुरठवठ्यावरुन म्हणाले की, देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. पण जेवढा लसींचा पुरवठा व्हायला हवा होता, तेवढा होत नाही. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक लस निर्मितीचे प्रमाण वाढवत आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा पाहणी दौरा केल्यामुळे टीका केली होती. अजित पवारांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी मुंबईत येणार आणि त्यानंतर ते गुजरातला जाणार असे ठरले होते. परंतु नंतर त्यांनी मुंबई दौरा रद्द केला आणि ते फक्त गुजरातला गेले. त्यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्र देखील भारतातच आहे. जर पंतप्रधान मुंबईत आले असते तर येथील लोकांनाही बरे वाटले असते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्यासह शिवसेनेच्या तीव्र विरोधाची दखल घेत उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, उजनी धरणाच्या पाण्याच्या बाबतीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली असून तसा आदेश काढला आहे. त्यानंतर देखील कोणाला काही करायचे असेल तर त्यांनी करावे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत दिला, तो सर्वांना मान्य करावाच लागेल. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.