वैद्यकीय परीक्षा रद्द होणार नाही, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णता काळजी घेतली जाईल : अमित देशमुख


मुंबई : अनेक विषयांच्या पदवी परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. यावर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. पण, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णता काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

देशमुख यांनी या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू असल्यामुळे 2 जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या 10 जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे, असे असताना या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत.

वास्तविक पाहता भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तिक ठरत नाही. तसे केद्रींय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. त्याचबरोबर ही बाब उच्च न्यायालयानेही नाकारली असल्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभुमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरित करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट मागच्या वर्षात असताना महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून त्या सुरक्षित वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात 10 जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपुर्णतः कोरोना सुरक्षा कवच पुरविले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेतली जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन शेवटी या निवेदनात अमित देशमुखांनी केले आहे.