म्युकरमायकोसिस : ३१ मेनंतर उपलब्ध होणार इंजेक्शन्स, राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता!


मुंबई – महाराष्ट्राला कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस या आजाराचा देखील फटका बसला असून राज्य सरकारकडून त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता सध्या आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत असून हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार असल्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये केंद्र सरकारने झुकते माप द्यायला हवे, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.

आपल्यासाठी पुढील १० दिवस फार महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये औषधांचा, इंजेक्शनचा कसा पुरवठा होईल, ते महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी मी स्वत: बोललो आहे. याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधील उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचे त्यांनी मान्य केले आहे. २० हजार इंजेक्शन एका किलोमध्ये तयार होतात. त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले. राज्य सरकारकडून म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबतची माहिती ते प्रसारमाध्यमांना देत होते.

दरम्यान, यावेळी राजेश टोपे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसवरचे मोफत उपचार मिळतील, असे देखील स्पष्ट केले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्यांच्याकडे कुठलेही रेशनकार्ड आहे, त्यांना या आजारावरचा उपचार मोफत मिळणार आहे. इएनटी, डेंटिस्ट, ऑप्थोमोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन असे लागतात. या आजारासाठी या सर्जरी कराव्या लागतात. या योजनेतून प्रत्येकाच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांचा कव्हर मिळतो. पण राज्य सरकारने जाणीवपूर्वक जो काही खर्च उपचाराला येईल, त्याची व्यवस्था केल्याची ते म्हणाले.

राजेश टोपे यांनी यावेळी म्युकरमायकोसिसवर आवश्यक असणाऱ्या उपचारांची आणि त्यांच्या उपलब्धतेविषयी देखील माहिती दिली. म्युकरमायकोसिसचे दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. पुढे दर आठवड्याला ५०० च्या आसपास रुग्ण वाढणार आहेत. आपल्याला या क्षणाला दीड ते दोन लाख इंजेक्शन हवे आहेत. त्यासाठी १ लाख ९० हजार इंजेक्शन्सची ऑर्डर देखील आपण दिली आहे. आपणच तिचे पैसे देखील देणार आहोत. पण त्याचे वाटप कसे करायचे, हे केंद्राच्या हातात आहे. जशी रेमडेसिविरला एक स्थिरता आली आहे, तशी या बाबतीत ३१ मेनंतर इंजेक्शनची उपलब्धता होईल. त्यामुळे पुढील १० दिवस महाराष्ट्रासाठी अडचणीचे असल्यामुळे केंद्र सरकारने प्रयत्न करून हे इंजेक्शन पुरवावीत, अशी मागणी देखील यावेळी टोपे यांनी केली आहे.