तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून राणेबंधूंची ठाकरे सरकारवर खोचक टीका


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईला तोक्ते चक्रीवादळ जरी धडकले नसले, तरी मुंबईच्या किनारी भागांना त्याचा फटका बसला आहे. तसाच तो महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारी भागांना देखील बसला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारी भागामध्ये वादळी पाऊस आणि त्यानंतर काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारला लक्ष्य करण्यास विरोधकांनी सुरुवात केली असून भाजप नेते निलेश राणे यांनी मुंबईतील एक व्हिडिओ शेअर करून थेट पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंचा वरळी हा मतदारसंघ असून ते याच मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले आहेत. निलेश राणे यांनी तोक्ते चक्रीवादळानंतरचा वरळीमधला एक व्हिडिओ ट्वीट केला असून त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

गुडघाभर पाण्यामधून नागरिक वाट काढत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चिंचोळ्या या व्हिडिओमधून गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळ्यामध्ये मुंबईत साचणारे पाणी, तुंबणारे नाले आणि लोकांची होणारी ससेहोलपट हे चित्र दरवर्षी दिसत असताना या वर्षी पावसाळा नसताना ऐन उन्हाळ्यात चक्रीवादळामुळे पाणी साचल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

नन
हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही, अशा शब्दांत निलेश राणेंना आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून कोकणाला देण्यात आलेल्या मदतनिधीवरून निलेश राणे यांच्याप्रमाणेच त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील निशाणा साधला आहे. कोकणाला गेल्या वर्षी तडाखा बसलेल्या चक्री वादळानंतर राज्य सरकारने जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्षात असलेली परिस्थिती, याविषयी त्यांनी ट्वीटमध्ये आक्षेप घेतला आहे.


त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हे बघा ठाकरे सरकारचं कोकणावर किती प्रेम ! इतक प्रेम कधीच कोणी केले नाही कोकणावर.. आता ही भरभरून देतील बघा.. आभार ! पुरावे, असे म्हटले आहे.