२४ वर्षाच्या कारकिर्दीतील बराचसा भाग आपण केला चिंताग्रस्ततेचा सामना – सचिन तेंडुलकर


नवी दिल्ली – आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नावावर केले असून कित्येक तरुणांपुढे आजही त्याचा आदर्श आहे. पण सचिन तेंडुलकरलाही आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागला. २४ वर्षाच्या कारकिर्दीतील बराचसा भाग आपण चिंताग्रस्ततेचा सामना केला असल्याचा खुलासा नुकताच सचिन तेंडुलकरने केला आहे. हा आपल्या तयारीचा भाग असल्याची नंतर जाणीव झाल्याचेही सचिनने सांगितले आहे.

त्याला कोरोनाच्या काळात मानसिक आरोग्याबद्दल बरीच चर्चा सुरु असून महत्व दिले जात आहे. बायोबबलमध्ये आपला बराचसा वेळ खेळाडूंनी घालवण्याबद्दल बोलताना सचिनने स्वीकार करणे हे महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. काळासोबत माझ्या लक्षात आले की, खेळासाठी शारिरीक तयारीसोबतच मानसिक तयारीदेखील महत्वाची असते. माझ्या डोक्यात मैदानात उतरण्याआधीच फार आधी मॅच सुरु झालेली असायची. त्यावेळी चिंताग्रस्त होण्याचे प्रमाण खूप असल्याचा खुलासा सचिनने अनअकॅडमीकडून आयोजित चर्चेदरम्यान केला.

जवळपास १० ते १२ वर्ष मी चिंताग्रस्ततेचा सामना केला. मला अनेक सामन्यांआधी झोप लागली नाही. पण त्यानंतर हा आपल्या तयारीचा भाग असल्याचे मी मान्य केले. मनाला शांती मिळावी यासाठी मी काही गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचे सचिन सांगतो. शॅडो बॅटिंग, टीव्ही पाहणे, व्हिडीओ गेम खेळणे यांचा त्या काही गोष्टींमध्ये समावेश होता. मला खेळासाठी तयार होण्यात सकाळचा चहा करणे देखील मदत करत होता.

मला खेळाच्या तयारीत चहा करणे, कपडे इस्त्री करणे मदत करत होते. सामन्याच्या एक दिवस आधीच मी बॅग पॅक करत असे. मला हे माझ्या भावाने शिकवले होते, नंतर तो सवयीचा भाग झाला. मी शेवटच्या सामन्यातही ही शिस्त पाळली होती, असे सचिन सांगतो. २०१३ मध्ये २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सचिनने निवृत्ती घेतली.

चढ आणि उतार प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येत असतात, ते स्वीकारण महत्वाचे असल्याचे सचिन म्हणतो. जेव्हा जखम होते तेव्हा फिजिओ, डॉक्टर तपासतात आणि निदान करतात. तसेच काहीसे मानसिक आरोग्याच्या बाबतीतही आहे. चढ उतार होणे हे प्रत्येकासाठी सामान्य आहे. जेव्हा उतार असतो तेव्हा आजुबाजूला आपले लोक हवे असतात. स्वीकारणे ही महत्वाची बाब असून फक्त खेळाडू नाही तर त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांसाठीदेखील हे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वीकार करता तेव्हा उपाय शोधू लागता, असे सचिनने सांगितले आहे.

यावेळी आपण कोणाकडूनही शिकू शकतो सांगताना सचिनने चेन्नईमधील हॉटेल कर्मचाऱ्याची आठवण सांगितली. मला डोसा घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याने एल्बो गार्डमुळे बॅट स्विंग होण्यात मर्यादा येत असल्याचे सांगितले होते. मला याचा फायदा झाला अशी आठवण तेंडुलकरने सांगितली. सचिनने यावेळी कोरोना योद्ध्यांचे आभार मानले. नुकतीच सचिन तेंडुलकरनेही कोरोनावर मात केली आहे.