तोक्ते चक्रीवादळाची रौद्र रुप धारण करण्यास सुरूवात ! घरे जमीनदोस्त, वादळी पावसाने झाडे उन्मळून पडली


नवी दिल्ली – हळूहळू तोक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण करण्यास सुरूवात केली असून दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सुरूवातीच्या टप्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झाले. पण, त्याचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले असून, त्याचा तडाखा केरळ, तामिळनाडूमध्ये जाणवण्यास सुरूवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांचे नुकसान झाले आहे. झाडे कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळातील मालापूरम कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम केरळच्या किनारपट्टी भागात दिसून येत आहे. केरळमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून, किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी या पाच जिल्ह्यात होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून, सध्या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. कासरगोड जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात वाऱ्याच्या वेगाने दुमजली इमारत कोसळताना दिसत आहे.


तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटांचा तडाखा बसला आहे. ६० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वलियाथुरा येथील पुलाचे नुकसान झाले आहे. समुद्राच्या लाटा आदळत असल्यामुळे पुलाला तडे गेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलाचे नुकसान झालेले होते. पुल वाकला असून, त्यामुळे पुलाकडे जाणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून जवळपास तीनशे किमी अंतरावर अरबी समुद्रातील चक्रीवादळ आहे. त्याचे येणाऱ्या कालावधीत रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची अंदाज असून, अरबी समुद्रातून याचा प्रवास सुरू होईल आणि १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दूरपासून हे वादळ जात असले, तरी त्याचा परिणाम होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.