जयंत पाटलांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी केले मोठे वक्तव्य


मुंबई – जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून नाराजी जाहीर केली. जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल बुधवारी वित्त विभागाकडे पाठवण्यावरून कुंटे यांना जयंत पाटील यांनी धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्विग्न उद्गारही त्यांनी काढले. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही अशाचप्रकारे मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा असून यावर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे.

कोणत्या मंत्र्याने काय सांगितले, हे मला माहिती नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्याचे ते ज्येष्ठ नेते असून, महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. काल त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेटमध्ये काय घडले याबाबत बाहेर सांगू शकत नाही. काही चर्चा झाली असेल. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नसल्यामुळे ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत महाविकास आघाडीत फूट असल्याचा दावा फेटाळून लावला. दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासंबंधी प्रश्नावर उत्तर देणे टाळले. वांद्र्यात लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला विचारला आहे.

राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तसेच मंत्रिमंडळातील चर्चा ही बाहेर सांगण्याची प्रथा नसते, त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी सीताराम कुंटे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याच्या प्रश्नावर बोलणे टाळले. कामकाज करत असताना कोणावर राजी नाराजी धरायची नसते. तेवढ्यापुरता तो विषय असतो. एका विषयाची नाराजी दुसऱ्या विषयावर धरायची नसते. त्यामुळे कोणावर नाराजी हा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील चर्चा सरकारच्या अंतर्गत बाब असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.