मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? फडणवीसांचा खोचक सवाल


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. पण, केंद्राने त्यासोबतच 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आता राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जर सर्वच केंद्राने करायचे, तर राज्य सरकारने काय माशा मारायच्या का? असा खोचक सवाल फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, केंद्राने सर्व काही करायचे आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या अन् मिळालेले आरक्षणही घालवायचे असे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकते यासंदर्भात विचार केला पाहिजे.

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. 102व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारी असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर टीका करताना पुढे म्हणाले की, आपले अपयश लपवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. मी केंद्राचे अभिनंदन करेन की एवढ्या जलद गतीने केंद्राने आपली भूमिका मांडली आहे. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये व्यस्त आहे. तुम्हाला माहिती नाही का की राज्यपालांच्या हातात काही नाही, असा सवालही फडणवीसांनी केला आहे.