महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसचे सुमारे १५०० रुग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


मुंबई – एकीकडे राज्यासोबतच केंद्र सरकारचीही आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असतानाच दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (Black Fungus) आजाराचे नवे संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. नागरिकांमध्ये देखील म्युकोरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजारामुळे आणि त्यावरच्या महागड्या उपचारांमुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले असताना या आजारावर राज्यात मोफत उपचार करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकराने केली आहे.

पण, यामुळे आधीच कोरोनाशी लढा देणाऱ्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, या आजारावरच्या औषधांचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आज माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी म्युकोरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीविषयी हर्षवर्धन यांना माहिती दिली.

काळी बुरशी (म्युकोरमायकोसिस) आजाराचे सुमारे १५०० रुग्ण महाराष्ट्रात असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.

त्यावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. तसेच, या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा. ज्या कंपन्या त्याचे उत्पादन करतात, त्यांना ते वाढविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.