ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठवणार


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (PSI) 2017 आणि 2018 च्या विद्यार्थ्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्र्यांनी पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा 2108 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण पात्र 737 उमेदवारांना जून 2021 पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक भरतीमधील निवड झालेल्या आणि 2017 मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण 737 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. या उमेदवारांचं प्रशिक्षण जून महिन्यापासून सुरु होईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.