राज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत पुन्हा वाढवला; कठोर निर्बंध लागू


मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पण, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते, त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी सर्वांनीच केल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत लॉकडाऊन लागू केल्याने कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक लागला आणि बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 5 एप्रिल 2021 रोजी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केल्यानंतर सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.