राज्यातील लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहू शकतो


मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर तो लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला होता. पण राज्यात आता लागू असलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट दिसून येत आहे. पण तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत असल्यामुळेच लॉकडाऊन आता 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी कॅबिनेटच्या होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोरोनाची परिस्थिती अनेक जिल्ह्यात अजूनही जैसे थे आहे. त्यामळेच 31 मे पर्यंत राज्यातील कडक निर्बंध कायम ठेवणार असल्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधित वाढीचा दर वाढताना दिसतो, त्यामुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवले जाऊ शकते.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात येईल, असे माहिती दिली आहे. लॉकडाऊनचा चांगला परिणाम राज्यात आणि मुंबईवर झाला आहे. लॉकडाऊन करायचा नसेल तर कशा प्रकारे लॉकडाऊननध्ये रिलॅक्सेशन द्यायचे यावर विचार होईल. टास्क फोर्स आणि महाविकास आघाडी मिळून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे अस्लम शेख यांनी दिली.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चालल्यामुळे यामुळे काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाबाधितांची जास्त संख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे मत उच्च न्यायालयाने देखील व्यक्त केले होते.