कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल


मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या जरी महाराष्ट्रात असली तरी त्याचा रोकथाम करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्येही राज्य अव्वल आहे. महाराष्ट्र कोरोना लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यामध्येही महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. लसीकरण मोहिमेत आजपर्यंत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात काल 5 मे रोजी 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र अव्वल असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. लसीकरणात महाराष्ट्राने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे.

महाराष्ट्राच्या पाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटकात (1 कोटी 1 लाख 11 हजार) एवढे लसीकरण झाले आहे.