येत्या काही दिवसांमध्ये भारतातील कोरोनाची स्थिती भयावह होण्याची शक्यता; अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचे मत


नवी दिल्ली: येत्या काही दिवसांमध्ये भारतातील कोरोना परिस्थिती भयावह होण्याची शक्यता असल्यामुळे भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकेच्या बायडन प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी हे मत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

कोरोनावर जर भारताला नियंत्रण ठेवायचे असेल तर लवकरात लवकर काही आठवड्यांचा लॉकडाऊन लावणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हे लॉकडाऊन लावत असतानाच शक्य तितक्या गतीने लसीकरण करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. कारण जसजसे लसीकरण वाढत जाईल, तसतशी ही लाट कमी येण्याची शक्यता आहे.

भारतातील सध्याची परिस्थिती ही युद्धजन्य असल्याचे मानावे आणि लष्कराच्या मदतीने शक्य तेवढ्या प्रमाणात फिल्ड हॉस्पिटल्स उभी करावीत असाही सल्ला डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी दिला आहे. भारतातील कोरोनावर उपाययोजना करताना राष्ट्रीय पातळीवर एक टास्क फोर्स सारखी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. अॅन्थनी फाऊची यांच्या मते, कोरोना विरोधात भारतात आता तीन पातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. एक म्हणजे तात्काळ काय उपाय करता येतील. दुसरे म्हणजे येत्या एक दोन आठवड्याभरात काय उपाययोजना करता येतील आणि तिसरे म्हणजे दुसऱ्या लाटेचा कालावधी वाढू नये तसेच तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील. आता डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी दिलेल्या सल्ल्यावर मोदी सरकार विचार करणार का? हे पहावे लागेल.