महाराष्ट्र आणि देशासाठी अदर पूनावाला यांनी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती : अजित पवार


पुणे – महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान निश्चित लसीचा अधिकाधिक पुरवठा केला जाईल, असे त्यावेळी सांगितले गेले. पण त्यांनी नंतर एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे सांगितले. पण त्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती. आपल्या पुण्यात लसीचा प्लांट असल्याने, आपल्या येथे अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मांडली. तसेच, सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नसल्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासल्याचेही त्यांनी सांगितले.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विधान भवन येथे ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत राज्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली. अजित पवार यावेळी म्हणाले की, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला आहे. तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडून अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या येथील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल, यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले की, सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे कोरोनाबधितांचे प्रमाण वाढले. त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात आजपासून 18 ते 44 पर्यंतच्या वयातील नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात होत आहे. या वयोगटातील 5 कोटी 71 लाख एवढी लोकसंख्या आहे. तरी साधारण 6 कोटी लोकसंख्या असेल आमचा अंदाज आहे. त्यानुसार दोन वेळा डोस द्यावा लागणार, असल्याने 12 कोटी डोस घ्यावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत साडे सहा हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही संपूर्ण रक्कम आम्ही एकरकमी देण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याच बरोबर आपल्या राज्याला आजच्या दिवशी 3 लाख मिळाल्या असून पुणे जिल्ह्यासाठी 20 हजार लसी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.