मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत मोठे विधान


मुंबई: कोरोना प्रादुर्भाची राज्यातील भीषण परिस्थिती पाहाता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश आधीच देण्यात आलेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आदल्या दिवशी राज्यातील जनतेला संबोधित केले व महत्त्वाचे आवाहन केले. राज्यात सध्या जे निर्बंध लादले आहेत. यापेक्षा अधिक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, असे मला वाटत असल्याचे वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला राज्यात १५ दिवस संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचा उल्लेख करत सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. लॉकडाऊन लावण्याचा विचार करायला उच्च न्यायालयाने कडक सांगितले आहे. त्यावर तुम्हाला आणखी कडक निर्बंध हवे आहेत का, अशी विचारणा मी जनतेला करत आहे. मला वाटते जनतेचे उत्तर नको असे असेल. मलाही तसेच वाटत आहे. तुम्ही जो संयम आणि समजूतदारपणा दाखवत आहात ते पाहता यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मला वाटत आहे. त्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज कोरोनाच्या खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात आपण निर्बंध घातले नसते व संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची स्थितीसुद्धा आज भीषण झाली असती. सुदैवाने गेले काही दिवस आपल्या राज्यातील कोरोनाचे आकडे स्थिर झाले आहेत. ते आकडे कमी करण्यासाठी, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला यापुढेही संयम दाखवायचा आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांचाही तपशील दिला.

आपण लॉकडाऊन केला आणि हात लॉक करून ठेवलेत असे झालेले नाही. आपण हातपाय हलवत आहोत. फिल्ड हॉस्पिटलची संख्या आपण वाढवली आहे. आता राज्यात साडेपाच हजार कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. ऑक्सिजन सुविधा, बेड्स याबाबत आपण सातत्याने काम करत आहोत. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.