मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन राज्य सरकारने १५ मे पर्यंत वाढवला आहे. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने काढला असून त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. यासंदर्भातील संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना दिले होते.
राज्यात १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम राहतील, असे जाहीर केले आहे. सरकारने राज्यात १४ एप्रिलपासून कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता.
Maharashtra government extends current COVID19 restrictions till May 15 pic.twitter.com/TaE6hCJoIV
— ANI (@ANI) April 29, 2021
हे निर्बंध आधीच्या आदेशांनुसार १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहता लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती. त्यासंदर्भात राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील स्पष्ट मत मांडले होते. राजेश टोपे यांनी देखील बोलताना लॉकडाऊन वाढवावाच लागेल अशीच राज्यातील परिस्थिती असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्य सरकारने त्यासंदर्भात आदेश काढले आहेत.