परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार


मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलली आहे. बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आता परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. पण शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेचा अर्ज भरण्याची मुभा शिक्षण मंडळाने दिली आहे. दरम्यान दहावीची परीक्षा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी जाहीर केले होते. राज्य मंत्रिमंडळाची कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेसंदर्भातील निर्णय एकमताने घेण्यात आला.

या बैठकीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून मूल्यांकन कसे करता येईल, तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.