एका अटीवर भारत बायोटेक महाराष्ट्राला सहा महिन्यात देणार 85 लाख डोस


मुंबई : एकीकडे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे कोरोना लसीच्या अभावामुळे बंद झाली आहेत, तर दुसरीकडे देशभरात 1 मे पासून कोरोना लसीकरण अभियानाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. पण हा टप्पा लस शिल्लक नसल्यामुळे पार पाडण्यात अडचणी निर्माण होण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. पण यातच एक सकारात्मक बातमी आहे. कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणारी भारत बायोटेक कंपनीने महाराष्ट्र सरकारला येत्या सहा महिन्यात 85 लाख डोस देण्याची तयारी दर्शवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पत्र पाठवले होते. भारत बायोटेकने त्याला उत्तर देताना येत्या सहा महिन्यात महाराष्ट्राला कोरोना लसीचे 85 लाख डोस देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पण त्यासाठी भारत बायोटेकने अॅडव्हान्स पेमेंट करा, अशी मागणीही केली आहे.

भारत बायोटेकने महाराष्ट्र सरकारच्या पत्राला उत्तर देताना म्हटले आहे की, राज्याला मे महिन्यात कोरोना लसीचे पाच लाख डोस देऊ शकतो. सरकार याच्या माध्यमातून लसीकरण अभियानाचा तिसरा टप्पा सुरु करु शकते. यासाठी 600 रुपये प्रति डोस यानुसार दर आकारले जातील. याशिवाय कंपनीने अॅडव्हान्स पेमेंटची मागणी केली आहे.

मे महिन्यात कोरोना लसीचे पाच लाख तर जून आणि जुलै महिन्यात 10 लाख डोसचा पुरवठा महाराष्ट्र सरकारला केला जाईल. त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 20 लाख डोसचा पुरवठा करु, असे भारत बायोटेकने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालाही पत्र पाठवले होते, याचसंदर्भात माहिती देत उत्तर देत सीरम इन्स्टिट्यूट २० मे पर्यंत लस देऊ शकणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.