कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण सुचना


मुंबई : कोरोनाची दुसरी लाट राज्यात झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यापुढे आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. परिणामी उपचाराअभावी अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे अनेक मृतदेहांवर एकाच वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये अंत्यसंस्कार करावे लागत आहे. आता यागोष्टीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.

सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी नाही. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राज्यभरातील शवागृहांची स्थितीही सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. कोरोना काळातील समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या सूचना दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन आठवड्यापासून एक हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून येत आहेत. वाढत्या कोरोनाबाधितांसोबतच कोरोनाबळींचा आकडासुद्धा वाढत आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 28 जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला होता.

तर दूसरीकडे पुण्यातील दररोज वाढत चाललेल्या कोरोनाबळींच्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी कित्येक तास थांबावे लागत आहे. अनेकदा तर दुसरा दिवस उजाडत आहे. त्याचबरोबर येथील स्मशानभूमी चोवीस तास सुरु आहे.