वर्षभरापासून झटणाऱ्या राज्यातील शिक्षकांना 1 मे पासून सुट्टी जाहीर करा


मुंबई : ऑनलाईन शिक्षणाचे धडे मागील वर्षभरापासून देणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपले तरीसुद्धा सुट्ट्या जाहीर न केल्यामुळे 1 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून जोर धरू लागली आहे. इयत्ता 1ली ते 9वी वर्गाला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर तरी सुट्ट्या जाहीर कराव्यात आणि शिक्षकांना ऑनलाईन कामातून विश्रांती द्यावी, असे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.

पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेऊन देखील शैक्षणिक वर्ष समाप्त झाल्याची घोषणा अद्याप शिक्षण विभागाने केली नाही. त्याचबरोबर अनेक शिक्षक अजूनही ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत. शिक्षकांनी हे वर्ग आणखी किती दिवस सुरु ठेवावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील शिक्षकांनी मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटात अनेक अडचणीन तोंड देत ऑनलाईन शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर शासनाने काही शिक्षकांना सरकारी कामासाठी सुद्धा बोलवून काम करून घेतले. असे असताना विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम झाल्यानंतर 1 मे पासून सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडी संघटनेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.

देशातील इतर राज्यात ज्यामध्ये राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच दिल्ली येथे उन्हाळी सुट्टी जाहीर केली असताना महाराष्ट्रातील शिक्षण विभाग परीक्षेबाबत निर्णय झाल्यानंतर सुद्धा का घेत नाही ? असा प्रश्न महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या शिवनाथ दराडे यांनी शिक्षण विभागाला विचारून चार वेळेस मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या सुट्टीच्या मागणीकडे पाहून शिक्षण विभाग नेमका काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे.