वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला बोर्ड वॉक ठरणार मुंबईतील नवीन आकर्षण


मुंबई : मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प हा मुंबईतील नवीन आकर्षण ठरणार असून विविध धर्मीय स्थळांनादेखील तो जोडणारा ठरेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना सर्व संबंधीत यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधीत यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.

या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमीत सैनी, महानगरपालिकेच्या जी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बैठकीत सहभागी झाले होते.

प्राथमिक संकल्पनेनुसार हा प्रकल्प सुमारे ४.७७ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅक या दोन्ही बाबी समाविष्ट असतील. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी देखील हा प्रकल्प आकर्षणाचा भाग ठरेल.

प्रस्तावित बोर्ड वॉकचा अंतिम आराखडा आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, प्राथमिक संकल्पनेवर सर्व संबंधीत यंत्रणांनी चर्चा करुन आपापल्या अखत्यारितील मुद्यांविषयी स्पष्टता करावी. जेणेकरून, अंतिम आराखडा तयार करताना त्यांचा समावेश करता येईल.

या प्रकल्पाची बांधणी करताना माहीम कोळीवाडा वसाहतीला तसेच तेथील मच्छीमार बांधवांच्या बोटींना कोणताही अडथळा ठरणार नाही यादृष्टीने हा बोर्ड वॉक बांधण्यात येईल. त्यासोबत वांद्रे-वरळी सागरी सेतू आंतरमार्ग बदलाच्या ठिकाणी (इंटरचेंज) देखील बोर्ड वॉकला अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण विचार करून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सूचना केल्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाईल, असे ते म्हणाले.