पाण्याचे नियोजन म्हणजे काय ?

water
पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? या विषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. नियोजन कशाचेही असो त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करणे हा हेतू असतो. पैशाचे नियोजन असेच केले जाते. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे कशी होतील ? याचा विचार करणे म्हणजे पैशाचे नियोजन. ते नियोजन करण्याआधी आपल्याकडे किती पैसे आहेत हे बघावे लागते. त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या पैशातून कोणते काम करायचे आहे, त्याला किती पैसे लागणार आहेत याची माहिती घ्यावी लागते. पैसे कमी असतील आणि कामाची गरज मोठी असेल तर ? आता काय करावे असा प्रश्‍न पडतो. मग सुरू होते नियोजन. पैशाची गरज नीट तपासली जाते. काही वस्तू खरेदी करायच्या आहेत तर त्या कमी भावात मिळतील का ? याचा अंदाज घेतला जातो. काही ठिकाणी माणसे लावली जातात. माणसांनी करायची कामे कमीत कमी माणसात कशी होतील याचा विचार केला जातो. काटकसर करून आपल्या जवळ असलेल्या पैशातच ते काम कसे करून घेता येईल याची कोशीश केली जाते. त्यालाच म्हणतात नियोजन.

नियोजन करायला सुरुवात करतो तेव्हा एवढ्या पैशात हे काम होणे शक्यच नाही असे वाटत असते. पण काटकसरीचा विचार करायला लागतो. तसे ते काम तेवढ्या पैशात तर होतेच पण काही पैसे शिल्लकही राहतात. त्यामुळेच कोणताही व्यापारी आणि उद्योजक आपल्या जवळच्या साधनांचा आणि होणार्‍या खर्चाचा वापर बारकाईने विचार करीत असतो. शेतकरीवर्ग असे नियोजन करीत नाही. आपण पाण्याचा विचार करू. आपण शेतात उभ्या असलेल्या पिकाला पाणी देतो पण आपण देतो तेवढे पाणी त्या पिकाला आवश्यक आहे का? याचा विचार करीत नाही. याबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे पीक चांगले येण्यासाठी भरपूर पाणी लागत नाही. नेमक्या शब्दात सांगायचे तर पिकांना ‘मोजकेच’ पाणी लागते आणि ‘वेळेवर’ लागते. आपण जे पीक घेतो, त्या पिकाच्या वाढीच्या कोणकोणत्या अवस्थांत त्यात पाणी दिले पाहिजे, याची माहिती आधी घेतली पाहिजे आणि त्या त्या वाढीच्या अवस्थांत त्याला पाणी मिळेल याची योजना आखली पाहिजे. उगाच कधीही पाणी देत राहणे हा पाण्याचा गैरवापर आहे. या अवस्थेत सुद्धा आपण किती पाणी दिले पाहिजे याचा विचार करून तेवढेच पाणी दिले पाहिजे.

याबाबतीत लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे आपण झाडाला पाणी न देता झाडाच्या भोवतीच्या जमिनीला पाणी देत असतो. पाणी केवळ झाडाच्या बुंध्याला आणि त्यातल्या झाडाच्या मुळांना दिले पाहिजे. ते केवळ मुळांनाच मिळावे यासाठी काय करावे लागते याची माहिती घेतल्यास आपल्याला पाण्याची मोठीच बचत करता येईल. झाडांप्रमाणेच माणसालाही पाणी लागते. पाणी लागते म्हणजे प्यायला पाणी लागते. ते प्यायला लागते म्हणून आपण तहान लागताच पूर्ण शरीराला भिजवील एवढे पाणी अंगावर ओतून घेतो का ? नेमकेच आणि सरळ पोटात जाईल एवढेच पाणी तोंडाने भरतो ना ? मग हाच न्याय शेतातल्या पिकांना पाणी देताना लावायचा आहे. तेव्हा नेमके, वेळेवर आणि आवश्यक तेवढेच पाणी देण्याची योजना म्हणजे पाण्याचे नियोजन. पाण्याचे नियोजन करत असताना पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वापर या संबंधात काही सामान्य माहिती तरी असणे आवश्यक आहे, जिला आजच्या काळामध्ये जलसाक्षरता असे म्हटले जाते. साक्षर माणसाला अक्षराची तोंडओळख असते. तशी शेतकर्‍याला पाण्याची तोंडओळख होणे गरजेचे आहे. तिलाच जलसाक्षरता असे म्हणता येईल.

आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात जेवढे पाण्याचे साठे उपलब्ध आहेत तेवढ्या सगळ्यांचा वापर केला तरी महाराष्ट्रातली केवळ ३० टक्के जमीन बागायती होईल, असे म्हटले जाते. अर्थात उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला तर हे शक्य आहे. जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याकरिता आवश्यक एवढ्या पाटबंधार्‍याच्या योजना उभारणे. अशा उभारल्या तरच महाराष्ट्रातली ३० टक्के जमीन बागायती होणार आहे. प्रत्यक्षात शक्य असेल तेवढ्या योजना उभ्या केलेल्या नाहीत. अनेक योजनांना हातच घातलेला नाही. काही योजना पूर्ण झाल्या आहेत तर काही योजनांची कामे अर्धवट राहिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे योजना या शेती पिकविण्यासाठी उभारण्याऐवजी मते मिळविण्यासाठी उभारल्या जातात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा कल कोणतीही योजना पूर्ण न करता अनेक योजना अर्ध्या अर्ध्या करण्याकडे असतो. म्हणजे एखाद्या योजनेचा ङ्गक्त दगड बसवायचा आणि तेवढ्या जोरावर मते मागायची. मग पुढच्या निवडणुकीत आणखी थोडे काम करून लोकांच्या तोंडाला पाने पुसायची आणि अजून एकदा मते मिळवायची. अशा रितीने एकेक पाटबंधारे योजना तीन-तीन चार-चार निवडणुकांपर्यंत अशी रेंगाळत ठेवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात जेवढ्या पाटबंधार्‍याच्या सोयी होणे शक्य आहे तेवढ्या होत नाहीत. त्यामुळे सध्या तरी पाटबंधारे योजनांखाली जेमतेम १५ टक्के जमीन भिजते.

भारतामध्ये काही राज्यांत पाटबंधार्‍याच्या सोयी अमाप उपलब्ध आहेत. पंजाबमध्ये सगळी जमीन बागायतीच असते. हरियानातही ६० ते ७० टक्के जमीन बागायत आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात पाटबंधार्‍याच्या सोयी विपुल आहेत. भारत देशाचे एकूण क्षेत्राशी असलेले बागायत क्षेत्राचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण केवळ १५ टक्के आहे. पाण्याचा जास्तीत जास्त वापर झाला तर हे क्षेत्र ३० टक्के होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात ७० टक्के जमीन ही कायम जिरायत आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणार आहे. ही स्थिती बदलायची असेल तर उपलब्ध असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्र भिजविण्यासाठी कसा वापर करता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. या नियोजनाच्या एकेक पद्धती आपण क्रमाने बघणार आहोत. महाराष्ट्रात पाणी कमी. त्यावर पाटबंधारे प्रकल्प कमी. महाराष्ट्रात सारे उपलब्ध पाणी वापरणारे प्रकल्प तयार नाहीत. पण आहेत त्या प्रकल्पांची गणना केली तरी लहान-मोठ्या प्रकल्पांबाबत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. शिवाय महाराष्ट्राची सगळी जमीन सपाट नाही. चढ-उतार ङ्गार आहेत. त्यामुळे पाटबंधारे प्रकल्पांच्या उभारणीचा खर्चही मोठा होतो आणि खर्चाच्या मानाने कमी जमीन बागायती होते. शिवाय पाणी शेतापर्यंत नेण्याचाही खर्च जास्त आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पाणी ङ्गार महाग आहे.

या पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेशाच्या मैदानी प्रदेशातून प्रवास करताना एक गोष्ट जाणवते की, जमीन सपाट असल्याने एखाद्या पिकाला एका बाजूने पाणी सोडले की, आपोआप जमीन भिजवत ते दुसर्‍या टोकाला जाते. नजर ङ्गेकू तिकडे गव्हाचे पीक आणि एकही माणूस नसतो. ते महाराष्ट्रात शक्य होत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात पाणी महागही आहे आणि अवघडही आहे. एखाद्या पाण्याच्या साठ्यापासून पिकांपर्यंत पाणी नेताना आपल्याला नाकी नव येतात. त्यातच पण दांडाने पाणी देतो ज्याला मोकाट पाणी म्हणतात. पाण्याचा सर्वात अधिक गैरवापर या दांडात होतो. विहिरीतले पाणी मोटारीने वर काढले जाते आणि विहिरीपासून पिकापर्यंत दांडाने पाणी नेले जाते. ते दांडात झिरपत, जिरत पिकापर्यंत जायला बराच वेळ लागतो. काही वेळा गडी मोटार चालू करतो आणि न्याहारी करायला बसतो.

पाणी पिकापर्यंत जाईतोवर त्याची न्याहारी होते. तो पोटभर पाणी पितो. मग चंची काढून पान खातो. तंबाखूचा बार भरतो, मग तो निवांत दारं धरायला जातो. एवढा वेळ निसर्गाने उपलब्ध करून दिलेले अनमोल पाणी दांडातच संपून गेलेले असते. या पाण्याने दंडात काय पीक येते का ? या पाण्याचा उपयोग काय? दांडात येणारे निरर्थक गवत हेच त्याचे उत्पन्न. यालाच म्हणतात पाण्याचा अनुत्पादक वापर. काही काही शेतात तर दांडात पाणी तासभर जिरते आणि प्रत्यक्षात पिकाला अर्धा तास मिळते. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची शेती न परवडण्याचे सर्वात मोठे कारण कोणते असा प्रश्‍न विचारला तर मी उत्तर देईन ‘दांडात जिरणारे पाणी हे गरिबीचे आणि शेती न परवडण्याचे सर्वात मोठे कारण आहे.’ पाण्यासाठी बराच आटापिटा करावा लागतो, पण पाणी मिळावे म्हणून एवढा आटापिटा करण्यापेक्षा आहे ते पाणी विचारपूर्वक वापरावे. पाण्याची बचत म्हणजे पाणी कमावणेच असते.

Leave a Comment