राज्यात ई- पास मिळवण्यासाठी नेमके काय करावे लागणार ?


मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचण्यास सुरुवात असून ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध अजूनच कठोर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हांतर्गत प्रवासावरील निर्बंधही अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.

आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना अत्यावश्यक कारणांसाठी या ई-पासची आवश्यकता भासणार आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई-पास काढावा लागणार आहे.

राज्यात गुरुवारी रात्रीपासून प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले आहेत. हे नियम 1 मे पर्यंतच लागू असणार आहेत. त्यामुळे यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई-पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

ई-पास मिळविण्याची प्रक्रिया

  • https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला ई-पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम भेट द्यावी.
  • ज्यानंतर तेथील ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पुढे ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा लागले.
  • त्याचबरोबर यावेळी आवश्यक कागदपत्र येथे जोडावी लागतील.
  • प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावे लागणार आहे.
  • कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा लागेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे, याची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासता येईल.
  • पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.
  • या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगावी लागेल. जेणेकरुन पोलिसांनी विचारले असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

कोणत्या कारणांसाठी आणि  कोणाला मिळेल ई-पास

  • अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
  • आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी ई-पासची आवश्यकता नाही.
  • या पाससाठी कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह अर्ज करु शकतो.
  • ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस ज्यांना मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदत केली जाईल.