विरार दुर्घटना; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी


मुंबई – एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झालेले असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांमुळे रुग्ण पुरते हवालदील झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचां प्राम गमवावे लागल्यानंतर आज विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. विरार येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे राज्यातील लोकांच्या मनात कोरोनाचे प्रचंड भय आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या घटनांमुळे अधिक भर पडत असल्याचे फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी राज्य सरकारवर फडणवीसांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि प्रशासन प्रत्येक घटनेनंतर आम्ही याची चौकशी करू असे सांगतात आणि दरवेळी सांगितले जाते की हॉस्पिटलचे फायर ऑडिट करू, पण असे ऑडिट होताना कुठेच दिसत नाही. कोरोना काळात हॉस्पिटल्सवर मोठा ताण आहे.

अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठीचे चेक्स हॉस्पिटल्समध्ये कसे करता येतील हे पाहिले पाहिजे. गरज असेल, तर सरकारने हॉस्पिटल्सला मदत केली पाहिजे. भंडारा, इशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत. मृत्यूमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. तेथील रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याकरिता काही प्रभावी ठोस पावले सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत, अशी माझी सरकारला विनंती असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

अशा घटनांचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे. सरकारने या घटनांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपण भंडारा, नागपूर, नाशिक, विरार या प्रत्येक घटनेनंतर प्रतिक्रिया देतो. पण अशा घटना होऊ नयेत, याकरिता हवे तेवढे लक्ष आपले नाही. अशा घटनांमुळे कोरोनाविरोधातील लढाई अजून अडचणीची होत आहे. सरकारच्या सर्व विभागांनी एक कार्यक्रम हातात घेऊन पुढच्या महिन्याभरात राज्यातील सर्व हॉस्पिटल्सचे सेफ्टी ऑडिट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.