ऑक्सिजन तुटवडा; शरद पवारांच्या राज्यातील सर्व साखर कारखान्यांना सूचना


मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारा ऑक्सिजनचा तुटवडा सध्या चिंतेचा विषय बनत आहे. राज्य सरकार याबाबत सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहेत. अशात आता राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या आहेत.

याबाबत सर्व साखर कारखान्यांना वसंतदादा शुगर इस्टिट्यूटकडून पत्र देण्यात आले आहे. ऑक्सिजन निर्मिती उभारणीचे प्रकल्प सर्व साखर कारखान्यांनी हातात घ्यावेत. ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि वीजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते. त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभे करायला कमी खर्च लागेल, असे शरद पवार यांनी निर्देशित केल्याचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्याच्या कोरोना संकट काळात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करावे, असे पत्रात म्हटले आहे.

ज्या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु आहेत, तसेच ज्यांचे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत. अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे, अशा कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. त्यांच्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर केला तर खर्चसुद्धा कमी येईल.

सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार ऑक्सिजन उपल्बध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, पण आपल्या सर्व कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे पत्रात म्हटले आहे.

आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव कारखान्यांना आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी. सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री असल्याचे पत्रात म्हटले आहे.