
मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक करत, लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. पण तरी देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १३ नव्या कोरोनाबाधितांच्या नोंद झाली असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे.
आज दिवसभरात ६२ हजार २९८ रूग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात
त्याचबरोबर विशेष म्हणजे आज ६२ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
