यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यावर येऊ शकते मोठे संकट – नवाब मलिक


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असतानाच राज्यात ऑक्सिजन त्याचबरोबर रेमडेसिविर औषधाचा तुटवडा राज्य सरकारच्या चिंतेत भर टाकत आहे. यादरम्यान राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्राला यामध्ये दररोज २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी जाहीर केली आहे.

याबाबत ट्विट करत नवाब मलिक यांनी राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यावर मोठे संकट येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी पुढे म्हटले आहे की, नुकतेच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार आधीपासून मागणी करत असल्याप्रमाणे दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे.

आम्हाला आतापर्यंत दररोज ३६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दररोज २६ हजार इंजेक्शन्स मिळणार असल्यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यावर मोठे संकट येऊ शकते, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला केंद्र सरकारने दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देऊन राज्यातील नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी पुढे केली आहे.