कोरोनाचे विषाणू कोंबण्याचा पहिला प्रयोग मुख्यमंत्र्यांवर कर; शिवसेना आमदाराला नितेश राणेंचे उत्तर


मुंबई – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जर मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, या लोकांबद्दल एवढा तिरस्कार निर्माण झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे भाजप कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. दरम्यान भाजप नेत्यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.


संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत समाचार घेतला आहे. देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले…हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


तर संजय गायकवाड यांच्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील टीका केली आहे. यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख तथा टुकार जनाबसैनिक…अरे मंदबुद्धी, ते जंतू नसतात विषाणू असतात, असे ट्विट त्यांनी केले आहे.


दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या लोकांचे नीच राजकारण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंपा नावाचे ते चंद्रकांत पाटील…आज हा कोरोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून होत नाही. कोरोना फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला होत नाही. तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्रासाठी नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रापेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे म्हटले होते.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या १०५ आमदारांनादेखील मतदान केले आहे, हे भाजपने विसरु नये. महाराष्ट्राने त्यांचे २० खासदारदेखील निवडून दिले आहेत. अशावेळी केंद्रांकडून राज्यातील लसनिर्मिती कंपन्याना सांगितले जातं आहे की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडेसिविर देऊ नका. केंद्राकडे ऑक्सिजनची देखील मागणी केली, तरी केंद्र सरकार देत नाही, अशी टीका त्यांनी केली.

मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. आज जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केले असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केले असते? राज्यातील मंत्री जीव तोडून कोरोनाविरोधात लढाई लढत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचे काय?, अशी विचारणा संजय गायकवाड यांनी केली.

कोरोनाचे जंतू मला जर सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांतच कोंबले असते, एवढा तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसेच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला, असे ते शेवटी म्हणाले.