नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची राज्यपालांकडे मागणी


मुंबई : राज्य मंत्रिमंडळातून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची हकालपट्टी करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना केंद्र सरकारने मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी अद्यापपर्यंत दिलेला नाही. केंद्र सरकारच्या विरोधात नवाब मलिक यांनी असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी, तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी.

रेमडेसिवीर इंजेक्शनावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.