नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप; केंद्राकडून महाराष्ट्राला ‘रेमडेसिवीर’साठी नकार! केंद्रीय मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण


मुंबई : महाराष्ट्राला रेमडेसिवीरच्या पुरवठा करण्याला केंद्र सरकारकडून नकार दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर त्यांच्या या आरोपावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.


ट्वीट करत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते की, रेमडेसिवीरसाठी महाराष्ट्र सरकारने 16 कंपन्यांना सांगितले होते. तेव्हा त्या कंपन्यांकडून आम्हाला सांगण्यात आले की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध न पुरवण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना केंद्राकडून इशारा देण्यात आला होता की त्यांनी तसे केल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा खळबळजनक आरोप नवाब मलिकांनी केला आहे.


आपल्या देशात 16 कंपन्या आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीर निर्यात देणारी युनिट्स आहेत. त्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या 20 लाख कुपी आहेत. आता सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली गेल्यामुळे ही औषधे आता आपल्या देशात विकायला परवानगी देणे गरजेचे आहे, पण केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचे मलिकांनी म्हटले आहे.


या आरोपांवर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी केलेले ट्वीट धक्कादायक आणि खोटे असून त्यांनी दिलेली माहिती ही अर्ध सत्य आणि खोटी आहे. त्यांना वास्तविक माहिती नाही. केंद्र सरकार रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत सातत्याने राज्य सरकारशी संपर्कात आहे. तसेच कोणत्याही प्रकारे रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरवण्यास मदत करत आहे.


देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन आम्ही दुपटीने वाढवत आहोत आणि उत्पादकांना 12 एप्रिलपासून 20 हून अधिक प्लांटला तात्काळ परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरेसा रेमडेसिवीर पुरवठा करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. मांडवीय पुढे म्हणाले की, सरकारच्या नोंदीनुसार ईओयूचे केवळ एक युनिट आहे आणि सेझमध्ये एक आहे. आम्ही रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांपर्यंत पोहोचलो आहोत आणि कोणताही रेमडेसिवीरचा साठा अडवण्यात आलेला नाही. मी आपणास विनंती करतो आपण सांगितलेल्या या 16 कंपन्यांची यादी, स्टॉकची उपलब्धतेची माहिती सादर करा. आमचे सरकार लोकांच्या मदतीसाठी सर्व काही करण्यास वचनबद्ध असल्याचे मांडवीय यांनी म्हटले आहे.