वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करावी


वर्धा : हरिद्वार (उत्तराखंड) येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी वर्धा जिल्ह्यातून गेलेले काही भाविक आता परतीच्या वाटेवर असून वर्धा जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आणि दिवसेंदिवस होत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुंभमेळ्याहून परतणाऱ्या सर्व भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वतःहून कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

तसेच संबंधित व्यक्तींनी गृहविलगीकरणात राहून नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे. त्याचबरोबर कोणालाही कुंभमेळ्यात गेलेल्या आणि परत आल्यावर गृहविलगीकरणात न राहणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी वर्ध्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला 100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये मोठ्या संख्येने साधू-संत दुसऱ्या शाही स्नान पर्वाचे औचित्य साधत गंगा नदीत स्नान करत असल्याचे पाहायला मिळाले. कुंभमेळ्यामध्ये 48.51 लाख जण सहभागी झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, बहुतांश राज्यांनी निर्बंध लागू केलेले असताना हरिद्वारमधील कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला. 10 ते 14 एप्रिल कुंभमेळ्याच्या परिसरातील 1700 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत पाच दिवसात 2,36,751 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1701 जणांना कोरोनाची लागण झाली.

याबाबत माहिती देताना हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभु कुमार झा म्हणाले, आतापर्यंत मागील पाच दिवसात केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्टचे हे आकडे आहेत. अजूनही काही जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. पण परिस्थिती पाहता हा आकडा 2000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.