लॉकडाऊनच्या घोषणेआधी जनतेला पूर्वसूचना देणार : राजेश टोपे


जालना : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती दिली आहे. ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात आज बैठक पार पडली. लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर त्यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान राज्यातील जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता जून महिन्यात दहावीची परीक्षा आणि मे अखेरीस बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

तसेच जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमडेसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. गरजू रुग्णांनाच तिथेच ते दिले जाईल. त्यावर जिल्हाधिकारी नियंत्रण ठेवतील. पुढचे पंधरा दिवस ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत महत्वाचे असून या काळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी.

या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिले जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.