कोणत्याही प्रकारचा त्रास महाराष्ट्र सरकारने दिला, तर संघर्ष अटळ – नितेश राणे


मुंबई – राज्य सरकारकडून कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकाने राज्यात बंद ठेवण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. असे असले तरी सकाळी १० ते ५ या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने निर्णय घेतला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याच विषयावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

राज्यात लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. एक किंवा दोन आठवड्यांची टाळेबंदी राज्यात लागू होऊ शकते. यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून सोमवारपासून (१२ एप्रिल) सकाळी १० ते सायंकळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवली जातील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्टीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.


भाजप आमदार नितेश राणे यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून सर्व व्यापारी बांधवाबरोबर आम्ही आहोत!! महाराष्ट्र सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ असल्याचे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यातील जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केलेला आहे. तर आदेशाविरोधात भूमिका घेत शुक्रवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर सोमवारपर्यंत दुकाने उघडण्याचे व्यापाऱ्यांनी टाळले.