महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होण्याची शक्यता


मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यातील कोरोना स्थिती पाहता आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे. यावेळी दहावी-बारावी परीक्षांसंदर्भातही निर्णय घेतला जाणार आहे. त्याशिवाय राज्यात सध्या लागू असणारे निर्बंध आणखी कठोर केले जाणार की त्यामध्ये शिथिलता आणली जाणार यासंदर्भात निर्णय होणार आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांचा उंचावत असलेला आलेख पाहता या पार्श्वभूमीवर येत्या काळात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासन घेणार का, यासंदर्भातील धाकधूकही अनेकांनाच लागली असल्यामुळे आज पार पडणाऱ्या या सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सोबतच मुंबई लोकलबाबतही त्यांनी महत्त्वाचा इशारा दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व पक्षांतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर कोणत्या निर्यणावर पोहोचतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.