चालयचं… चालत रहायचे…!

चालणं हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. चालणं कसे आणि त्यातील लकबी याबाबत एक-दोन नव्हे तर अनेक म्हणी तसेच गाणी आपणास सापडतात अगदी चटकन आठवणारं गाणं म्हणजे.. हिची चाल तुरु तुरु किंवा तितकच लोकप्रिय राहिलेले.. नको चालूस दुडक्या चाली.. जीव होतोय वरती खाली.. चालण्याचे संदर्भ आपल्या मनात अनेक असतील.

आशाबाईंचे चांदण्यात फिरतांना.. धरलास हात म्हणणार्याड प्रेमिकेच ते, चांदण्यात चालणं श्रवणीय असे आहे. मूल चालताना पहिल्यांदा बघितलेला क्षण प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो.. मूल रांगणं म्हणजेच त्याची पुढे जाण्याची धडपड आणि  चालण्याचा जोरदार प्रयत्न असतो आणि त्याचा पुढचा टप्पा पळण्याचा  धावण्याचा असतो.

बापूंची दांडी यात्रा आणि त्यातून रुढ झालेला मिठासाठीचा सत्याग्रह मराठीला नवा शब्द देणारा ठरला. बापू चालले आणि देश चालला आणि पुढे स्वातंत्र्य चालतच आले असे म्हणावे लागेल.

चालणारे आपण कसे जाणार असे विचारल्यावर ११ नंबरची गाडी असा शब्दप्रयोग गंमतीने करतात. लहानपणी आजी अंगणात चांदण्या मोजताना गोष्ट ऐकवायची त्यातला राजकुमार निबिड अरण्यातून राक्षसाच्या गुहेपर्यंत जायचा त्यावेळी त्याला असणारे दोन रस्ते एक छोटा पण संकटांनी भरलेला तर एक विना अडचणीचा आणि लांब रस्ता.. त्या अडचणीच्या रस्त्यावर चालत संकटाचा मुकाबला करीत आपणही डोळे मिटून जंगलात चालायचोच ना.

वाहने उपलब्ध नाहीत अशा काळात पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी काशीचा प्रवास म्हणजे काशी यात्रा ही आयुष्यातील शेवटची यात्रा म्हणूनच सर्वजण घरातून निघायचे वाटेवरले वाटसरु, पथिक कधी कधी वाटमारीचे बळी ठरायचे त्यामुळे बेरड हा सार्यांणच्या आठवणीचा एक भाग होवून गेला आहे.

चलते चले, लहरोंके साथ … आदमी मुसाफिर है चालमे झटका.. लगे पचासी झटके.. अनेक अनेक गाणी हिंदी चित्रपटात आहे. काही गाणी आपल्या मनात उभं राहणार्याट चित्रापेक्षा वेगळी असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ रुक जा ओ जानेवाली रुक जा, मै तो राही तेरी मंजील का..’ या गण्यातला नायक चक्क हातातून घसरुन गेलेल्या दारुच्या बाटलीला उद्देशून हे गाणं म्हणतोय हे चित्रपट बघितल्यावरच कळते.

हे असे चालायचचं, चाल करुन जाणे… केवढा हा चालूपणा…! पायात-पायात चालू नको…, कसे चाललय आपले..? चालूगिरी, चालूपणा, चवचालपणा अशा अनेक अर्थाने मराठीत यातून आलेल्या शब्दांना आपण चालवून घेतो.. कुठं कुठं तर पैसेही चालतात बघा. हे सारं चालू पुराण संपवताना एक संदेश आठवतो. तुम्ही आम्ही ठाकूर रविंद्रनाथांचा संदेश कायम स्मरणात ठेवून आयुष्याची ‘ वाट ’ ‘ चाल ’ करायची तो म्हणजे ‘ एकला चलो रे…!

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment