राज्य सरकारने घेतला एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय


मुंबई – राज्य सरकारने येत्या ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील केली होती.

सरकारने हा निर्णयकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी घ्यावा, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असे देखील या बैठकीत ठरल्याचे सांगितले जात आहे.

राज्य सरकारने वाढू लागलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने निर्बंध लागू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अभ्यासावर याचा परिणाम होत आहे. त्यातच काही परीक्षार्थींना देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

विद्यार्थी घाबरले आहेत. पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्याची अस्वस्थता होती. संवेदनशील मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हा निर्णय घेतील आणि परीक्षा पुढे ढकलतील याची मला खात्री होती. आता तो निर्णय झाला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात असल्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी तातडीची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.