मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली असून वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. याच दरम्यान लॉकडाऊनसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने?; राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य
राजेश टोपे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना परिस्थितीत जर सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल, असे म्हटले आहे. लॉकडाऊनच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, पण तो करावा लागू नये, अशी अपेक्षा आहे. त्याआधी आपण जर कोरोनाला रोखले तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. आम्ही सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
आपण लॉकडाऊनच्या समर्थनात नसल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट करत सांगितले की, जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो, तेव्हा तात्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो.
लॉकडाऊन मागचा कोरोनाची साखळी तोडणे हा मुख्य हेतू असतो. जगभरात आपण पाहिले तर १५ दिवस ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन हा गरजेचा असून त्याचे कडक पालन झाले पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.