आशिष शेलार यांची दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पाहता दहावी, बारावीची परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात, असे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. कोरोनाने राज्यात थैमान घातले असल्यामुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.

आपली भूमिका मांडतांना आशिष शेलार यांनी सांगितले की, कोरोनाची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये परिक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.