राज्यातील कोरोना लसीकरण मोहिम तीन दिवसात बंद पडण्याची शक्यता – राजेश टोपे


मुंबई – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. वेळेत लसींचा पुरवठा महाराष्ट्राला न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण मोहिम बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची मंगळवारी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या. त्यांनी याबद्दलची माहिती मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितले. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील, असे प्रकाश जावडेकर यांच्याकडून सांगण्यात आले. साडे चार लाखांपर्यंत आम्ही पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नसल्याची सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत असल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र लसीकरण करणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारकशक्ति निर्माण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी लसीकरण महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. पण लस मिळत नाही हा मोठा प्रश्न असल्यामुळे मी पोटतिकडीने विनंती केली आहे. खासकरुन कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे. का देऊ नये हा भागही आग्रहपूर्वक मांडला. लस दिली तर मोठा प्रश्न सुटेल, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

सर्वात जास्त फिरणाऱ्यांमध्ये आणि कोरोना होणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील लोक आहेत. यामुळे या वयोगटाचे इंफेक्शन कमी करायचे असेल तर त्या पद्दतीने लवकरच १८ पुढील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे. ही काळाची मागणी आहे. इतर ठिकाणी उशीर करा पण राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचे असल्यामुळे लवकर परवानगी द्या अशी मागणी केली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

त्याचबरोबर राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असून आम्हाला जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी मागणी केली. ती त्यांनी गांभीर्याने नोंदवली असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असे आवाहन खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये, अशी विनंती त्याचबरोबर त्याची साठेबाजी करु नका असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.