मुंबईत सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, सकाळी 6 वाजता दादर मार्केटमध्ये तुडूंब गर्दी


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असतानाच महाराष्ट्र शासनाकडून तो रोखण्यासाठी नुकतेच काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले. ज्याअंतर्गत सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व घटकांची काळजी हे निर्बंध लावताना घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. पण असे असले तरी अद्यापही भाजी मंडई, फूल मार्केट मात्र बंद करण्यात आलेले नाही. पण, अर्थातच या ठिकाणी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण, तसे होताना मात्र दिसत नाही.

मुंबईतील दादर येथे असणाऱ्या भाजी मंडई आणि फूल मार्केटमध्ये जमलेल्या गर्दीमुळे याचीच प्रचिती देत आहे. एकीकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे. पण, प्रशासनाला केराची टोपली दाखवत नागरिक पण पावलोपावली त्याच्या बेफिकीरीचीच झलक दाखवत आहेत.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांअंतर्गत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कर्फ्यूच्या नियमांअतर्गत रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेशही लागू आहेत. पण, या आदेशांना धुडकावत सकाळी हा वाजल्यापासून दादरमध्ये जणू कोरोना केव्हाचाच पाठ फिरवून दूर पळाला आहे, अशा अविर्भावात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.

फळे, भाजीपाला आणि इतर काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या या गर्दीत कित्येकजणांनी तर मास्कही वापरला नव्हता, येथे सोशल डिस्टन्सिंग ही संकल्पनाच पायाखाली चिरडून गेल्याचे पाहायला मिळाले. नागरिक आणि विक्रेत्यांचे हे निर्धास्त वर्तन एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारण ठरत आहे, तर तिथे प्रशासनाची डोकेदुखीही वाढवत आहे. मुख्य म्हणजे सध्याच्या घडीला प्रशासन कठोर निर्बंधापुरताच सीमित राहिले आहे. पण, नागरिकांकडून वारंवार होणारी ही चूक पाहता आता त्यांच्याच हितासाठी राज्यात लॉकडाऊन लागू झाले, तर यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.