ठाकरे सरकारने किमान या पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्यावी; भाजपचा सवाल


मुंबई – ठाकरे सरकारने रविवारी राज्यातील कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन करण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेतला. भाजपने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करतानाच भाजपने ठाकरे सरकारला जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या, असे म्हणत काही सवाल केले आहेत.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करताना काही शंकाही महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केल्या आहेत. उपाध्ये यांनी ट्वीट करून राज्यातील वेगवेगळ्या घटकांबद्दल आणि उपाययोजनांविषयी सरकारला उत्तर मागितले आहे.


जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी दया… कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार? रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार,कमाईची व्यवस्था? या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का? रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का? पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का?, असे प्रश्न उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.