अखेर सीबीआयला घाबरून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, नारायण राणे यांची टीका


मुंबई – आज(सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्रीपदाचा अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली होती. अनिल देशमुख यांनी अखेर आज राजीनामा दिल्यानंतर, भाजप नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषद घेत भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदारा टीका केली.

पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, पोलीस आयुक्तांना आणि सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी मुंबईतून १०० कोटी जमा करून द्यायला सांगितले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. पोलीस आयुक्त उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सांगितल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खळबळ माजली, भयभीत वातावरण तयार झाले. अनिल देशमुख यांनी आयुक्त आरोप करतात तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांना त्यांच्या नेत्यांनी सांगायला हवे होते. पण तो दिला गेला नाही, अखेर उच्च न्यायालयाला सांगावे लागले की सीबीआयने चौकशी करावी आणि सीबीआयचं नाव येताच, त्यांना वाटले की मी सीबीआय समोर गेलो तर वस्तूस्थिती सांगावी लागेल. या भीतीपोटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.

तसेच, यावर मला असे म्हणायचे आहे की, केवळ अनिल देशमुखच नाही पण यामध्ये आता लवकरच एनआयएकडून व सीबीआयकडून अहवाल येईल व आपले पण नाव येईल म्हणून अनेकजण भयभीत झालेले आहेत. काहीजण प्रतिक्रिया देखील देत नाहीत. मुख्य जबाबदार व्यक्ती असताना, सचिन वाझेला ज्यांनी पोलीस खात्यात घेतले. त्यांची गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती केली. अनेक महत्वाच्या केसेस देखील दिल्या, अशी व्यक्ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत का? सर्वच नेते बोलत आहेत, मग हे का गप्प आहेत? त्यांचा सहभाग आहे की काय? घाबरले आहेत की काय? सचिन वाझे, परमबीर सिंह हे पोलीस खात्यातीलच माणसे आहेत मग ते वास्तववादी चित्र बाहेर आणत असताना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे ते राज्याचे प्रमुख आहेत. पण ते बोलत नाहीत. याचाच अर्थ मी समजतो, त्यांचा कुठेतरी सहभाग आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय बदल्यांमध्ये पैसे, करदात्या दुकानदारांकडून पैसे उकळण्यासाठी आणि महिन्याला १०० कोटींच टार्गेट हे शक्य नाही आणि म्हणूनच मला वाटते हा राजीनामा अगोदरच द्यायला हवा होता, पण उशीरा झाला. शेवटी सीबीआयला घाबरून हा राजीनामा दिला असल्याचे माझे मत आहे, असे देखील नारायण राणेंनी सांगितले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री या सगळ्यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी सचिन वाझेला अटक करायला अनेक वेळा व्यत्यय आणला. त्याच सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी काम दिले होते. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते का? परमबीर सिंह यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले, त्यावर देखील काही उत्तर दिले गेले नाही. याचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य आज कुठे चालले आहे? आतापर्यंत मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. कुठल्याही मंत्र्याची चौकशी केल्यास त्याला राजीनामाच द्यावा लागेल, अशी प्रकरणे आहेत. ज्यांच्या नेतृत्वात राज्य सुरू आहे, त्यांना काहीतरी थोडे वाटायला हवे. आपण भ्रष्टाचार करून पैसे कमावायला आलो आहोत की जनतेला न्याय द्यायला आलो आहोत? याचा विचार करायला हवा.