ब्रेकिंग न्यूज ! अनिल देशमुखांनी दिला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा


मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील आणखी मंत्र्याने राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. सीबीआयला चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन देशमुख यांनी त्यांना माहिती दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असे अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.