… मग येत्या काही दिवसांत काही कडक निर्बंध लावावे लागतील – उद्धव ठाकरे


मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्येत देखील वाढ झाल्यामुळे ही राज्य सरकार आणि प्रशासनासाठी देखील चिंतेची बाब ठरली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुण्यात देखील मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर संध्याकाळी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. परिस्थिती अशीच राहिली, असे मी म्हणालो होतो. तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावा लागतो की काय, अशी शक्यता होत आहे. आजही ती परिस्थिती कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. कोरोना गेला, अशा रितीने सगळे सुरू होते. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप मार्चमध्ये धारण करून कोरोना आला आहे. हा कोरोना आपली परीक्षा बघत आहे. पण यावेळी आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आगामी काही दिवसांत काही कडक निर्बंध लावावे लागतील. उद्या किंवा परवा ते जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाही. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतो आहे, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी अजून काही जणांशी अजून काही जणांशी बोलत आहे. मला वेगळा उपाय हवा आहे. लॉकडाऊन हा उपाय नाही. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतर देखील काही प्रमाणात कोरोनाची लागण होऊ शकते. पण या सगळ्यापेक्षा मला राज्यातील जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही नियम पाळा, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण काहीही लपवलेले नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. दुसरीकडे काय झाले, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचे नाही. मला कुणी व्हिलन ठरवले, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाही टोला लगावला.

संसर्ग थांबवण्यासाठी आणि आपली आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग आहे. सध्या रुग्णवाढ ही झपाट्याने होत आहे. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते. १ एप्रिलला त्यात भर पडली आहे. तेव्हा ३१ हजार मृत्यू होते. आता ५४ हजार ९०० च्या आसपास रुग्ण झाले आहेत. तेव्हा एका दिवशी २४ हजार रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ४३ हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत.

ही परिस्थिती अशीच राहिली, तर १५ ते २० दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील. त्याही वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण बेड वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयुचे बेड वाढले, तरी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कसे वाढणार? हाच खरा चिंतेचा विषय असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. डॉक्टर, नर्स, कर्मचारी आपल्यासारखेच माणसे आहेत. ते आजारी पडले. त्यानंतर निगेटिव्ह झाल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांच्या सेवेत येत आहेत. टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपलेच बंधू-भगिनी अथकपणे काम करत आहेत. त्यांना आपण दिलासा देणार आहोत की नाही?, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आमच्या विरोधात बोलणारे बोलतातच. आपण लसीकरण वाढवले पाहिजे. कालच्या दिवसात महाराष्ट्रात ३ लाख नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात एकाच दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. आत्तापर्यंत आपल्या ६५ लाख नागरिकांना लसीकरण केले आहे. आपल्या क्षमतेनुसार लशींचा पुरवठा होत नाही. ती मागणी मान्यही होईल, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

लॉकडाऊनचा ७ कलमी कार्यक्रम अमेरिकेने जाहीर केला. आपल्याकडच्या राजकीय पक्षांना देखील त्यांचे नाही, पण मी केलेले आवाहन तरी मानावे. त्यात राजकारण करण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.