आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री घेऊ शकतात महत्वपूर्ण निर्णय; विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गुरुवारी २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले असून राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ झाली असून त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे. देशातील रुग्णसंख्येत आघाडीवर असल्याने राज्य सरकार चिंतेत असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी एखादा महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ही महत्वाची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील, यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फाईल गेली आहे. आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांना मुंबई लोकल बंद होणार का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, आपण मागील वर्षी लोकलसंदर्भात निर्णय घेतला होता. आपण विभागणी केली असून वेळेनुसार प्रवासाला मुभा दिली आहे. त्यामध्ये मग आरोग्य विभाग, रेस्तराँ, कर्मचारी, चाकरमानी यांचा समावेश होता. मागील वेळी जी उपाययोजना केली होती, तशीच यावेळीही करणार असून त्यांनी मुंबई लोकल बंद होणार नाही, अशी माहिती यावेळी दिली. लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध लावले जातील आणि त्याचे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले जाईल. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर भर असेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच वेग नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ५० टक्के क्षमतेने रेस्तराँ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर जर योग्य प्रतिसाद लोक देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील, असे महापौर म्हणाल्या. मुंबईतील लोकल प्रवासावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाची मूभा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर लोकांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नसल्यामुळे मॉल्स आणि थिअटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही महापौर पेडणेकर यांनी यांनी सांगितले.