दिपाली चव्हाण प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा – देवेंद्र फडणवीस


मुंबई – राज्यात मेळघाट येथील हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हे सरकार आंदोलन केल्याशिवाय सरकार हलत नाही. प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव करण्याचा या महाविकास आघाडी सरकारचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी केला आहे.

वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यांनी या पत्रात फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर अवघ्या २८ वर्षी आत्महत्या करण्याची वेळ येते, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलने झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट, प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन, त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? असे ट्विट फडणवीस यांनी केले.