दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४३ हजार १८३ जणांची वाढ


मुंबई – कोरोनाचा उद्रेक आता राज्यात पाहायला मिळत असून राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत.

राज्यात लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. पण तरी देखील कोरोनाबाधित मोठ्या संख्येने आढळून येत असल्यामुळे राज्य सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, २४९ जणांनी आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज ३२ हजार ६४१ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.