शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना ममता बॅनर्जींचे पत्र


नवी दिल्ली – देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिले आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही यामध्ये समावेश आहे. विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी ममता बॅनर्जी यांनी पत्रातून सुचवले आहे. पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख ममता बॅनर्जी यांनी केला असून भाजपकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे, असेही मत व्यक्त केले आहे.

दिल्लीत नुकताच नवीन कायदा मंजूर करण्यात आला असून केंद्राचे प्रतिनिधी असणाऱ्या नायब राज्यपालांना यामध्ये लोकनियुक्त सरकारच्या तुलनेत जास्त अधिकार देण्यात आले आहेत. पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी याचा उल्लेख करत देशातील अशा सात घटनांचा उल्लेख केला आहे, ज्याला त्यांनी भाजपने लोकशाही आणि सहकारी संघराज्यवर केलेला हल्ला असे म्हटले आहे.

इतर पक्षांना घटनात्मक हक्क आणि स्वातंत्र्य मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. राज्य सरकारांचे अधिकार सौम्य करून त्यांना केवळ पालिकेच्या स्तरावर न्यायचे आहे. थोडक्यात त्यांना संपूर्ण देशात एका पक्षाचे हुकूमशाही शासन स्थापन करायचे असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मला वाटते आता ती वेळ आली आहे जेव्हा भाजपकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. मी टीएमसीची प्रमुख म्हणून मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इतर पक्षांसोबत या लढ्यात असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्रसमिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ममता बॅनर्जींनी हे पत्र पाठवले आहे.